भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. पहाटेपासून भारत-पाकमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू आहे.
पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फतेह 1 क्षेपणास्त्रद्वारे पाकने भारतावर हल्ला केला. पाकिस्तानकडून भारताच्या अनेक हवाई तळांवर हल्ले करण्यात आले. जम्मू एअर बेस, उधमपूर एअर बेस, पठाणकोट एअर बेस, श्रीनगर एअर बेस, बियास एअर बेसवर पाककडून हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गेले दोन दिवस भारतावर भ्याड ड्रोन हल्ले करत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ला करत लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकने केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय लष्कराकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य करत ड्रोन हल्ला केला होता आणि भारतीय लष्कराने याचाच बदला घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.