आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला.
परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. यामुळे आता प्रश्न उपस्थित केला जातोय की हस्तांदोलन न केल्यामुळे टीम इंडियावर आयसीसीकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार की नाही? दरम्यान, पाकिस्तानच्या टीम मॅनेजरने हस्तांदोलन न केल्याबद्दल भारताविरुद्ध 'औपचारिक निषेध' नोंदवल्याची माहिती आहे.
क्रिकेटच्या नियमांनुसार, जर एखादा संघ सामन्यापूर्वी किंवा नंतर विरोधी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करत नसेल तर तो गुन्हा नाही. हस्तांदोलन हा खेळ भावनेचा एक भाग मानला जातो. कोणत्याही संघाला किंवा त्यांच्या खेळाडूंना सामन्यादरम्यान त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन करण्यास भाग पाडले जात नाही. दोन्ही संघांचे खेळाडू सामन्यानंतर हस्तांदोलन करतात ही फक्त क्रिकेट संस्कृतीची बाब आहे.
स्पर्धा ही आयसीसीची असो, एसीसीची असो किंवा देशांतर्गत विरोधी संघाशी हस्तांदोलन करणं अनिवार्य नसतं. पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कोणताही दंड आकारला जाणार नाही, कारण असं करणं क्रिकेटच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन नाही.