साई संस्थानच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय ; समितीच्या अध्यक्षपदी
साई संस्थानच्या अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय ; समितीच्या अध्यक्षपदी "यांची" नियुक्ती
img
Dipali Ghadwaje
शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका प्रशासकीय समितीची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

यासंबंधी आज विशेष आदेश जारी करण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे या समितीचे सदस्य असणार आहेत.

समितीमध्ये कोण कोण असणार?

या प्रशासकीय समितीमध्ये प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांचाही समितीत समावेश आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे समितीचे अध्यक्ष असतील. तर, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे या समितीचे सदस्य असतील. शिर्डीचे नगराध्यक्ष (सध्या रिक्त) सदस्य तर मुख्य कार्यकारी अधिकारी (गोरक्ष गाडीलकर) या समितीचे सदस्य असतील, असा हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार ही प्रशासकीय समिती तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून संस्थानच्या दैनंदिन कारभाराचे योग्य नियोजन केले जाईल.

विशेषतः साईभक्तांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये आणि व्यवस्थापन कार्यक्षमतेने चालावे, यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या निर्णयामुळे आता संस्थानच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या प्रशासकीय समितीवर असणार आहे. संस्थानच्या २००४ मधील अभियमाच्या कलम ३४ मधील तरतुदीच्या आधारे ही प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.
 
   
इतर बातम्या
Join Whatsapp Group