महाराष्ट्रातील मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल एनआयएच्या विशेष कोर्टाने गुरुवारी सुनावला. तब्बल १७ वर्षांनी कोर्टाने या प्रकरणातील सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात तपास करणारे तत्कालीन एटीएस अधिकारी महबूब मुजावर यांनी मोठे खुलासे केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पकडण्यासाठी वरिष्ठांनी दबाव टाकला होता. याबद्दल असा आदेश होता. हा आदेश रेकॉर्डवर होता. या कामगिरीसाठी सरकारने निधी सुद्धा दिला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट ATS चे माजी अधिकारी महबूब मुजावर यांनी केला आहे.
मेहबूब मुजावर म्हणाले की, मालेगाव स्फोट प्रकरणी मोहन भागवत यांना पकडा, असे मला आदेश मिळाले होते. हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठीच माझा या प्रकरणाच्या तपासात सहभाग करण्यात आला होता. मला थेट मोहन भागवतांना अडकवण्याचे निर्देश होते. हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोट तपासाचे प्रमुख अधिकारी परमबीर सिंह आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला होता असा दावा त्यांनी केला. मोहन भागवत यांना पकडलं नाही म्हणून माझ्यावर खोटा खटला दाखल केला. त्यातून माझ्या करिअरचे ४० वर्ष उद्ध्वस्त झाले असंही मेहबूब मुजावर यांनी दावा केला आहे.
मोहन भागवत आणि अन्य निर्दोष व्यक्तींना या खटल्यात अडकवण्याचा सरकार आणि तपास यंत्रणांचा हेतू होता. संशयितांमध्ये संदीप डांगे आणि रामजी कलसंगरा यांची हत्या झाली होती. त्यांचे जाणुनबुजून आरोपपत्रात जिवंत दाखवण्यात आले. ते मृत असताना मला त्यांचे लोकेशन ट्रेस करण्याचे आदेश दिले होते. जेव्हा मी या गोष्टीचा विरोध करत चुकीचे काम करण्यास नकार दिला तेव्हा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु मी निर्दोष सुटलो. आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का असा प्रश्नही मेहबूब मुजावर यांनी केला आहे.