मुंबई महापालिका निवडणुकासहित राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने चांगली कामगिरी केली. ओवैसी यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात एकूण १२६ उमेदवार जिंकले आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मुंब्रा येथील महिला नगरसेवकाची जोरदार चर्चा होत आहे. नवनिर्वाचित नगरसेवकाने थेट सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं आहे. या महिला नगरसेवकाचं विजयानंतरचं भाषण सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाची सहार शेख ही तरुणी निवडून आली आहे. सहार शेख हिचे वडील युनूस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे प्रचाराला गेले असताना त्यांच्याशी हुज्जर घालणाऱ्या युनुस शेख यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
यंदाच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळे सहर शेख ही एमआयएमकडून (MIM) निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनुस शेख आणि सहर शेख या बाप-लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली. 'या विजयी सभेत सहर शेख हिने भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. आपण त्या लोकांच्या अहंकाराच्या चिंधड्या उडवल्या. काहींना वाटत होते आपण त्यांचे गुलाम आहोत, पण आमच्यासाठी फक्त अल्लाह सर्वोच्च आहे, आम्ही कोणाच्या बापाचे मिंधे नाही.
पुढे ती म्हणाली, प्रभाग क्रमांक 30 मध्ये सगळ्यांनी भरभरुन मतदान करुन एमआयएमच्या उमेदवारांना जिंकवले. पाच वर्षांनी याठिकाणी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे. या लोकांना इथून पळून जावे लागले पाहिजे. पाच वर्षांनी मुंब्रा परिसरात सगळे एमआयएमचे उमेदवार निवडून येतील, ही मजलिसची ताकद आहे. ही ताकद आपल्याला अल्लाहने दिली आहे. मुंब्रा परिसरात नोटाला जास्त मतदान झाले आहे. मुंब्रा परिसरात तुतारीच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतं पडली आहेत. शेर के बच्चे को हराने के लिए पुरी की पूरी गिधाड की टीम की फौज तैनात करनी पडी. बिलकुल काम ही नही आया, अशी टीका सहर शेखर यांनी केली.
युनुस शेख यांनी आक्रमक भाषेत जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करताना म्हटले की, जितेंद्र आव्हाडला मी जीजी नाव ठेवले आणि तो महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. अल्लाहतालाने माझ्या मुलीला 'हिजाबवाली बेटी' म्हणून लोकप्रिय केले. जितेंद्र आव्हाड यांनी इथून पुढे कोणत्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नये. नाहीतर आमचा समाज एकत्र येऊन विकेट कशी पाडतो, हे बघितलं ना. जर प्रभाग क्रमांक 30 मध्ये कुठलाही अडथळा निर्माण केला तर इथून काय-काय निघणार, याचा तू विचार सुद्धा करु शकत नाहीस. निवडणूक झालेली आहे मी सर्वांना माफ केले आहे. परंतु जे जे म्हणजे झुठा जितेंद्र आव्हाड यांना कदापि माफ करणार नाही, प्रभाग क्रमांक 30 मध्ये जर कधी फिरताना दिसला तर तुला दाखवतो, अशी थेट धमकी देत युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले आहे.