सलमान खाननंतर आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला बिश्नोई गँगने टार्गेट केले आहे. आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई या गुंडांनी सोशल मीडियावरील एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिपद्वारे अभिनेत्याला जीवे मारण्याची गंभीर धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये बिश्नोई टोळीने आमिर खानवर 'लव्ह जिहाद'चा आरोप करून धमकी दिली आहे.
आरझू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई (लॉरेन्स बिश्नोई ग्रुप) यांच्या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून ही धमकी वजा पोस्ट शेअर करण्यात आल्याचं समजतं. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आमच्या संस्कृतीच्या विरोधात जाऊन देशात लव्ह जिहादच्या नावाखाली आमिर खानसारखे लोक या गोष्टीला खतपाणी घालत आहेत. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही आणि याचे उत्तर लवकरच दिले जाईल. हे आमच्या सनातन धर्म आणि देशाच्या विरोधात आहे. जे लोक स्टारडमच्या नावाखाली अशा गोष्टींना प्रोत्साहन देत आहेत, त्यांचा श्वास आम्ही बंद करू, असंही या धमकीत म्हटलं गेलंय.मात्र, या ऑडिओ क्लिपची आणि सोशल मीडिया पोस्टची सत्यता अद्याप पोलिसांनी अधिकृतपणे पडताळलेली नाही.
आमिर खाननं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील वांद्रे इथल्या त्याच्या घरी गौरी स्प्रॅटशी रजिस्टर मॅरेज केलं. या लग्नानंतर काही कट्टरपंथी संघटना आणि राजकीय गटांकडून त्याच्यावर टीका केली जात होती.या आरोपांना उत्तर देताना आमिर खाननं यापूर्वीच एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं की, "गौरी हिंदू नाही, ती ख्रिश्चन आहे आणि ती धार्मिक प्रथांचे पालनही करत नाही. तसेच आपलं हे लग्न 'स्पेशल मॅरेज ऍक्ट' (विशेष विवाह कायदा) अंतर्गत झालं असून यात कोणत्याही प्रकारचे धार्मिक धर्मांतर झालेलं नाही, असंही आमिरनं स्पष्ट केलं होतं.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित धमकीप्रकरणी आमिर खान किंवा त्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत किंवा रीतसर तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र, लॉरेन्स बिश्नोई गँगचे बॉलिवूडमधील वाढतं नेटवर्क आणि यापूर्वी सलमान खानला मिळालेल्या धमक्या पाहता, सुरक्षा यंत्रणा या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत.