महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज अनेक ठिकाणी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली, तरी राज्यातील काही भागांत पाऊस सुरूच आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे, या भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांकरिता या पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पावसाची सर्वाधिक नोंद झाली आहे. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कुठे-किती पावसाची नोंद?
राज्यात कालपासून आज १७ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ७३.७, रायगड ५४.१, रत्नागिरी ४७.७, सिंधुदुर्ग १२.७, पालघर ४९.७, नाशिक ७.७, धुळे ७.१, नंदुरबार ४, जळगाव ६.७, अहिल्यानगर १.१, पुणे ११.९, सोलापूर ०.९, सातारा १९.७, सांगली ६, कोल्हापूर १७.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना ०.१, बीड ०.७, लातूर ०.१, धाराशिव १.६, नांदेड ३.६, परभणी १.७, हिंगोली ३.६, बुलढाणा ३.५, अकोला ८.७, वाशिम ८.५, अमरावती ९.४, यवतमाळ ८.७, वर्धा ७.६, नागपूर ०.९, गोंदिया ०.२, चंद्रपूर ११.९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.