मान्सूनचा धुमाकूळ! ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट , राज्यात तुफान पाऊस कोसळणार
मान्सूनचा धुमाकूळ! ३ जिल्ह्यांना रेड अलर्ट , राज्यात तुफान पाऊस कोसळणार
img
Dipali Ghadwaje
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून पावसाने राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.

कालही राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वाऱ्यांचा वेग प्रचंड होता. त्यामुळे झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब पडले. पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

पुढील ४८ तास कोकणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. तसेच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना शनिवारी ऑरेंज अलर्ट  देण्यात आला आहे.

आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापासून ओडिशापर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगड, मराठवाडा, कर्नाटकचा अंतर्गत भाग येथून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत चक्रीय वातस्थितीच्या वरच्या भागात ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.

उत्तर भारतातील पंजाब ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती दिसत आहे. राजस्थानचा आग्नेय भागापासून मध्यप्रदेशापर्यंत चक्रीय स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. ही परिस्थिती येत्या 17 जूनपर्यंत कायम राहील अशी शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 15 जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  

आज कोल्हापूर, कोल्हापुरचा घाट परिसर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शुक्रवारी आणि शनिवारी रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज रायगडला ऑरेंज तर शनिवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group