उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राला आता काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी पावसाने हजेरी असून संपूर्ण मराठवाडा मान्सूनच्या छायेखाली असून येत्या 24 तासांत आणखी काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागे दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २४ जूनसाठी ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणकणातील काही भागात पावसाची तिव्रता वाढण्याची शक्यता आहे. पालघरसह काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर रत्नागिरीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे सह सातारमध्ये कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह मुळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले आहे. तर कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.
मराठवाड्यात मान्सूनचे आगमन
मराठवाड्यातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. तर अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारा पावसाची शक्यता आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता ?
धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.विदर्भात 23 जून रोजी काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी उष्णतेची लाट कायम आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत हिट वेव्हचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे आणि वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील पुढच्या काही तासात अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पुढील ७२ तास महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर राहील.