सध्या राज्यातील वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. कुठे पाऊस तर, कुठे गारपीटीने शेती पिकांनचे मोठे नुकसान होत आहे. अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. तर काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट होताना दिसत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील धारुर गावात देखील गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच सरकार मदत करणार असून, खंबीर राहा असा धीर देखील शेतकऱ्यांना दिला.
तात्काळ पंचनामे करा
एखादं नुकसान जास्त दाखवलं तरी चालेल पण कमी करु नका, सरनाईकांचे आदेश धाराशिवच्या धारुर गावात गारपीटीनं प्रचंड मोठ नुकसान झाला असून, या नुकसानीचा आढावा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. प्रताप सरनाईक यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. शेतातील नुकसानीची माहिती जाणून घेत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
सरनाईक यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना तात्काळ पंचनामे करा, एखादं नुकसान जास्त दाखवलं तरी चालेल पण कमी करु नका, कमी करुन शेतकऱ्यावर अन्याय करु नका असे आदेश प्रताप सरनाईक यांनी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दिले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी मदतीबाबत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना विचारले असता पंचनामे होऊ द्या सरकार तुम्हाला मदत करेल असं आश्वासनही यावेळी प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे.
शेत जमिनींसह रस्तेही गारांच्या थराने पांढरेशुभ्र
अनेक ठिकाणा गारांचा खच धाराशिव तालुक्यात मंगळवारी, 21 एप्रिल रोजी दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावत भयंकर वादळी वारे, गारपीट आणि मुसळधार पावसाचा तडाखा दिला. धारुर, केशेगाव, कोल्हेगाव आदी परिसरात या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीसह मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विठ्ठलवाडी येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश काळवंडले आणि काही क्षणातच जोरदार वादळी वारे सुरू झाले. त्यानंतर मुसळधार पावसासह मोठ्या आकाराच्या गारांचा मारा झाला. विशेषतः धारूर परिसरात गारपीट इतकी तीव्र होती की, शेत जमिनींसह रस्तेही गारांच्या थराने पांढरेशुभ्र झाले. अनेक ठिकाणी गारांचा खच साचल्याने जणू बर्फवृष्टी झाल्याचा भास होत होता.