नागपूर: प्रसिद्ध कथावाचक आणि बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू लोकसंख्येविषयी केलेल्या दोन वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात नवा वाद पेटला आहे. त्यांच्या या विधानांवरून शिवप्रेमी आणि विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते.
नागपूरमधील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात उभारण्यात येणाऱ्या 'भारतदुर्गा मंदिरा'च्या भूमिपूजन व शिलान्यास कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीचा एक कथित प्रसंग सांगितला.
"छत्रपती शिवाजी महाराज सततच्या युद्धांनी आणि संघर्षांनी खूप थकले होते. ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी आपली सत्ता व मुकुट त्यांच्या पायावर ठेवून राज्य सांभाळण्याची विनंती केली. यावर समर्थ रामदास स्वामींनी त्यांना आपले शिष्य मानून सांगितले की, हे राज्य चालवणे तुमचेच कर्तव्य आहे आणि ते तुम्हालाच चालवावे लागेल". बागेश्वर बाबांनी मांडलेल्या या दाव्याला इतिहासकारांनी आणि शिवप्रेमींनी धादांत खोटा ठरवत तीव्र निषेध नोंदवला आहे.
४ मुले जन्माला घाला, एक RSS ला द्या
याच व्यासपीठावरून हिंदूंच्या लोकसंख्येवर बोलताना बागेश्वर बाबांनी आणखी एक वक्तव्य केले. ते म्हणाले, "देशात कुठेही आपत्ती आली की लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळतात. अशा वेळी फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता तिथे जाऊन लोकांचे प्राण वाचवतो". याच कौतुकाचा धागा पकडत त्यांनी पुढे आवाहन केले, "प्रत्येक हिंदू कुटुंबाने किमान चार मुलांना जन्म दिला पाहिजे. त्यातील तीन स्वतःकडे ठेवा आणि एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समर्पित करा, जेणेकरून ते इतरांचे प्राण वाचवण्याचे काम करेल".
व्यासपीठावर दिग्गज नेत्यांची उपस्थिती
विशेष म्हणजे ज्यावेळी बागेश्वर बाबा व्यासपीठावरून ही विधाने करत होते, त्यावेळी त्यांच्यासमोर आणि व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
महाराष्ट्रात संतापाची लाट
बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. "छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य हे कोणाच्या झोळीत टाकण्यासारखे नव्हते," असे म्हणत राजकीय नेत्यांनी बागेश्वर बाबांवर "चुकीचा इतिहास" सांगितल्याचा आरोप केला आहे. बाहेरील लोकांनी महाराष्ट्रात येऊन छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडू नये, असा इशाराही शिवप्रेमींकडून देण्यात येत आहे.