सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला असून अनेक हालचाली सुरु आहेत . उबाठा पक्षाच्या खासदारांनी बंडखोरी केल्यापासून राजकारणात मोठे भूकंप पाहायला मिळाले . दरम्यान, आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुंबईतील विविध विकास प्रकल्प आणि आगामी कामांबाबत चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. पालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी विधानभवनात दाखल झाल्या होत्या. यावेळी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी हे देखील उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी काल विधानभवनातील सभागृहात मुंबईतील विविध प्रकल्पांची माहिती दिली होती. तसेच आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबतही त्यांनी सविस्तर माहिती मांडली होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या भेटीदरम्यान मुंबईतील प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि नागरिकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे पत्रही सादर केल्याचे सांगितले जात असून या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.