राज्यभरासह मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार बघायला मिळात आहे. अशातच मुंबईतील मानखुर्द भागात एका तीन मजली चाळीचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. धोकादायक असलेली ही चाळ रिकामी करण्यासाठी घरातील सामान आवरत असतानाच अचानक पावसाने घात केला आणि संपूर्ण घर कोसळले. या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे 5 निष्पाप लहान मुले आणि एका महिलेसह 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन मदतीला धावले आहेत.
मानखुर्दच्या जनतानगरमध्ये 3 मजली घर कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळतात NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि BMC कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेवर महापौर रितू तावडे म्हणाल्या, मानखुर्द दुर्घटनेत ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमीवर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेने तातडीने बचावकार्य हाती घेतले. मृतांच्या कुटुंबीयांची गोवंडी शताब्दी रुग्णालयात भेट घेऊन घेतली, प्रशासन सर्वतोपरी मदत करणार आहे. जखमीची प्रकृती स्थिर असून बाधित कुटुंबांच्या पाठीशी महापालिका ठामपणे उभी आहे’.
मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘मानखुर्दच्या जनतानगरमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी नाशिकहून थेट घटनास्थळी पोहोचलो असून परिस्थितीची पाहणी केली. या परिसरात अत्यंत अरुंद गल्ल्या असून एकावर एक मजले चढवून घरे बांधण्यात आली आहेत. तळमजल्यावरील सुमारे 12 बाय 12 फुटांच्या घरांवर तीन-तीन मजले उभारण्यात आले आहेत. ही बहुतांश बांधकामे अनधिकृत स्वरूपाची आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. मात्र, प्रचलित नियमांनुसार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळेल’.