''अशी'' काळजी घेतली तर पावसाळ्यातही भाजीपाला राहील ताजेतवाना !
''अशी'' काळजी घेतली तर पावसाळ्यातही भाजीपाला राहील ताजेतवाना !
img
Nandini khandare More

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्याने फळे आणि भाज्या नेहमीपेक्षा अधिक लवकर खराब होतात. योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास त्यांच्यावर बुरशी येणे, चव बदलणे आणि पोषणमूल्य कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. मात्र, काही सोप्या उपायांचा अवलंब केल्यास फळे-भाज्या अधिक काळ ताज्या ठेवता येतात आणि अन्न वाया जाणेही टाळता येते.

फळे आणि भाज्या घरी आणल्यानंतर सर्वप्रथम त्यांची नीट तपासणी करा. मऊ पडलेली, तडकलेली किंवा कुजण्यास सुरुवात झालेली फळे-भाज्या वेगळ्या काढून ठेवा. अशा वस्तू इतर ताज्या पदार्थांजवळ ठेवल्यास त्यांच्यावरही परिणाम होऊ शकतो.

अनेकजण खरेदी केल्यानंतर लगेच फळे-भाज्या धुऊन फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, पावसाळ्यात ही सवय टाळणे अधिक फायदेशीर ठरते. ओलावा राहिल्यामुळे बुरशी आणि जिवाणू वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वापरण्यापूर्वीच फळे-भाज्या धुणे अधिक योग्य मानले जाते.

साठवण करताना हवा खेळती राहील अशा पिशव्या किंवा डब्यांचा वापर करा. पालेभाज्या टिश्यू पेपर किंवा स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवल्यास अतिरिक्त ओलावा शोषला जातो आणि त्या अधिक काळ ताज्या राहतात. तसेच काही फळांमधून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक वायूमुळे इतर फळे-भाज्या लवकर पिकतात, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे.

फ्रिजमध्ये अनावश्यक गर्दी करू नका. हवा व्यवस्थित फिरली तर अन्नपदार्थ जास्त काळ टिकतात. तसेच साठवलेल्या फळे-भाज्यांची दर दोन-तीन दिवसांनी तपासणी करा. दुर्गंधी येणे, रंग बदलणे, बुरशी दिसणे किंवा पदार्थ चिकट होणे ही खराब होण्याची लक्षणे आहेत. अशी फळे किंवा भाज्या खाणे टाळावे, कारण त्यामुळे अन्नविषबाधेचा धोका वाढू शकतो.

पावसाळ्यात नेहमी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात फळे-भाज्या खरेदी करणे, फ्रिज स्वच्छ ठेवणे आणि योग्य साठवणुकीच्या सवयी पाळणे हेच त्यांचा ताजेपणा आणि तुमचे आरोग्य दोन्ही जपण्याचे उत्तम उपाय आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group