मटनानंतर दही खाणे जीवावर बेतले? नाशिकमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू
मटनानंतर दही खाणे जीवावर बेतले? नाशिकमध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू
img
Nandini khandare More

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातुन एक धक्कादायक  बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका वृद्ध दाम्पत्याने चिकन खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. यात पत्नीचा रुग्णलयात दाखल करताच मृत्यू झाला तर पतीवर दवाखान्यात उपचार सुरु करण्यात आले असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. या प्रकरणात चिकन नंतर या दाम्पत्याने दही खाल्ल्याचे उघडकीस आले आहे. 

बागलाण तालुक्यातील  आखतवाडे येथे अन्नातून विषबाधेची ही गंभीर घटना समोर आली आहे. रात्री मटणाचे जेवण केल्यानंतर थोड्याच वेळाने दही खाल्ल्याने एका शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेत पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे.

द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शांताराम ह्याळीज (वय ६०) यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दाम्पत्याने मटणाचे जेवण केले. त्यानंतर काही वेळाने त्यांनी दही खाल्ले. त्यानंतर काही मिनिटांतच दोघांची तब्येत बिघडू लागली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच द्वारकाबाई यांचा मृत्यू झाला. पतीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच बागलाण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. नेमकी विषबाधा मटणामुळे झाली की दह्यामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच खरी कारणे स्पष्ट होणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कलिंगड खाल्ल्यानंतर विषबाधेच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता मटणामुळे झालेल्या या घटनेमुळे नाशिक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group