राजकारणातील घडामोडींना वेग आलं असून सध्या राजकीय वर्तुळात मोठे भूकंप सुरु आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.
खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. पक्षात आपले बहुमत असतानाही निवडणूक आयोगाने अमित शाह यांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांना 5 हजार कोटी रुपयांना विकल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगातील कथित गैरप्रकारांवरही जोरदार टीका केली. “निवडणूक आयोगात सेटिंग आणि बेटिंग करण्यात जनतेचे 5 हजार कोटी रुपये खर्च झाले,” असा आरोप त्यांनी केला. तसेच अमित शाह यांच्या ‘शेअर मार्केट’मधून आमचा पक्ष विकला गेला, असा गंभीर दावा करत निवडणूक आयोगाने केवळ शिवसेनाच नाही, तर आणखी चार पक्ष विकल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
दरम्यान, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचाही राऊत यांनी उल्लेख केला. ही सुनावणी उद्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष आणि निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा दाखला देत सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांच्या हयातीत उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची घटना तयार करण्यात आली आणि ही घटना निवडणूक आयोगाला कळवण्यात आली होती. संबंधित पत्रव्यवहाराच्या रीतसर पोहोचपावत्या ठाकरे गटाकडे असल्याचा दावा राऊत यांनी केला.
मात्र, निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयात शिवसेनेची पक्षघटना आणि पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत केलेल्या निरीक्षणांवरही राऊत यांनी आक्षेप घेतला. पक्ष अलोकशाहीवादी असल्यासारखे विचित्र युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या निर्णयात करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातच संजय राऊत यांच्या या गंभीर आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.