पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम, फेसबुक तसेच इतर सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करत आहेत.तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नागिरकांना एक आवाहन केलं आहे.
प्रत्येक व्हिडीओमध्ये ते देशातील नागरिकांना तसेच तरुणाईला विशेष संदेश देत आहेत. दरम्यान , आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेविषयी सांगितले आहे.
मोदींनी केले नागरिकांना आवाहन
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करावा, असे आवाहन मोदींनी केले. स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीसाठी संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. ‘हर घर तिरंगा, हर मन में तिरंगा’ असा संदेश देत मोदी म्हणाले की, प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना अधिक मजबूत करूया, असेही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.
‘हर घर तिरंगा’ अभियान ऑगस्ट महिन्यात देशभर राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना आपल्या घरांसह दुकाने, कार्यालये आणि इतर ठिकाणी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मात्र, या अभियानाचा उद्देश केवळ ध्वज फडकवणे नसून नागरिकांच्या मनात तिरंग्याबद्दल अभिमान आणि देशाशी असलेली भावनिक नाळ अधिक घट्ट करणे हा आहे.
देशातील विविध भागांमध्ये सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था आणि इतर संघटनांकडून तिरंगा फडकावण्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या उपक्रमांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरुवात ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या आधी हे अभियान मोठ्या उत्साहात राबवले जाते.