राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे लवकरच 'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग ठरणार असल्याचा खळबळजनक दावा धाराशिवचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी केला आहे. तुळजाभवानी मंदिर परिसरातील वादग्रस्त 'चिनी' सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्यात सरनाईक यांनी कैलास पाटलांवर फिरकी घेत या नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले आहेत.
तुळजापूर मंदिर परिसरात केंद्र सरकारची परवानगी नसलेले चिनी बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला होता. या आरोपांना प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी लगावला. ते म्हणाले की, "कैलास पाटील हे केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी असा बनाव करत आहेत. पण त्यांनी उपस्थित केलेल्या त्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आता त्यांच्या हालचालींवर, ते कुठे जातात आणि काय करतात यावर बारीक लक्ष ठेवले जाईल. याच माहितीच्या आधारे आम्ही 'ऑपरेशन टायगर २' यशस्वी करू." असे ते म्हणाले.