एकीकडे पावसाने महाराष्ट्राला झोडपले असून आता राज्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्यरात्री महाराष्ट्र हादरला असून राज्याच्या काही जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
समोर आलेल्या ,माहितीनुसार , मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड भागात मध्यरात्री 1 वाजून 37 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीत शिंदे पांगरा गावाला सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिक झोपेतून दचकले. त्यानंतर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड या भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती हाती आलेली नाही. या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने मदतीसाठी धावाधाव केली. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडू नये. तसेच अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
नांदेड जिल्ह्यातही मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्के जाणवले. नांदेडमध्ये 4.2 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली. मध्यरात्री झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिक भयभीत झाले. भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमतजवळ होते, अशी माहिती हाती आली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात सलग भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
मराठवाड्यात मध्यरात्री जवळपास 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का हा सुमारे 1 वाजून 37 मिनिटांनी बसला. या भागात मध्यरात्री 1.37 ते 3.23 या वेळेत 4 भूकंपाचे धक्के जाणवले. गेल्या सहा वर्षांत हिंगोली 37 पेक्षा अधिक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यात एकाच दिवशी आणि अवघ्या दोन तासांत 4 धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झालेत. पहिल्यांदा दोन तासांत 4 धक्के जाणवल्याची घटना घडली. या घटनेमुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
हिंगोलीत 6 वर्षांपासून भूकंपाचं सत्र
हिंगोलीत मागील 6 वर्षांपासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. हिंगोलीत औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत या तालुक्यांमध्ये जमिनीतून भूगर्भातून गूढ आवाज येणे आणि सौम्य धक्के बसण्याचे सत्र सुरू माहिती मिळत आहे. जिल्ह्यात मध्यरात्री लागोपाठ आलेल्या भूकंपाच्या चार धक्क्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरलं आहे. भूकंपामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.