महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप येत असून त्याचे हादरे ठाकरे गटाला बसत आहेत . याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी जय महाराष्ट्र करत मध्यरात्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा फटका मानला जात आहे.
मध्यरात्री सव्वाच्या सुमारासा शुभांगी पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. शेकडो कार्यकर्त्यांसह त्या मुंबईत आल्या आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. ऑपरेशन टायगर अंतर्गत 6 खासदार आणि सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेतल्यावर, शिवसेना ठाकरे गटाच्या आणखी एक नेत्या, शिंदेसेनेत आल्या. शिंदे यांच्या शिवसेनेकडून शुभांगी पाटील यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
मध्यरात्री झालेल्या पक्षप्रवेशानंतर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मी १५ वर्ष, १०० ते १५० आंदोलन केले, ३५ हजार शिक्षक घेऊन अपक्ष लढले. उद्धव साहेबांना बोलले होते, मला शिक्षक पदवीधर म्हणून उमेदवारी मिळावी पण वेगळंच घडलं. मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप शुभांगी पाटील यांनी यावेळी केला.
एकदा आम्हाला तुमची वेळ द्या, २० हजारचा मागच्या वेळी मेळावा घेतला होता . २० ते ३० हजार शिक्षक दिसतील तुम्हाला, तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल आभार , अधिकमास गेला पण तो आज आहे असे मला जाणवलं असं पाटील म्हणाल्या. सर्व निवडणूक जिंकून येऊ हा शब्द देते, सर्वांच्या वतीने लाडक्या भावाला एकनाथ शिंदे याना उदंड आयुष लाभो , जी संधी तुम्ही द्याल ती आम्ही प्रामाणिक पणे पार पडू , काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करत असंही त्यांनी नमूद केलं.
यावेळी पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. मी शिक्षक पदवीधरचे काम अनेक वर्षापासून करत आहे. 35 हजार शिक्षक आणि कार्यकर्ते आहेत काही कामे अडली तर याच मंत्री महोदय यांच्याकडे जावे लागते. दादा भुसे यांच्याकडे शिक्षण खाते आहे, ते शिवसेनेचे आहे आतापर्यंत अडचण आली नाही, काम फ़ास्ट होण्यासाठी आम्हाला प्रवेश करणे गरजेचे होते , असं पाटील म्हणाल्या.
मी जाण्याचा निर्णय घेतला, सगळ्यांशी बोलणं चाललं होतं, पण थांबा असं कोणीही बोललं नाही, अडचण काय आहे असं कोणी विचारलंही नाही. मी जात आहे असं सांगितलं त्यावर काही उत्तर आलं नाही. आम्ही श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे चालू होते, प्रश्न सुटतील असे ते बोलले. सगळ्यांच्या मनात खडखड आहे , कार्यकर्त्यांना वेळ दिला जात नाही . वेळ मागतो ते वेळ देत नाही, कार्यकर्ते बोलतात मातोश्रीला जाऊ पण वेळ मिळत नाही, अशी शब्दांत पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त करत अनेक आरोप केले.