राज्यातील घडामोडींना वेग आला असून आता ठाकरे गटाचे खासदार फुट्ल्यापासून राजकारणात मोठा भूकंप आलेला असून आता मोठ्या हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान आता आणखी एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.
खासदार फुटीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. खासदारांच्या फुटीनंतर आक्रमक भूमिका घेत, ठाकरेंनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा निश्चित केला आहे. भविष्यात राज्यातील दोन पक्षाचे खासदार फुटणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. पुढील काळात एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील खासदार फुटून भाजपमध्ये जातील, असा दावा त्यांनी केलाय. रोहित पवारांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
आमदार रोहित पवार यांनी सध्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे. या कर्जमाफीसाठी रोहित पवार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना भेटी देत आहेत. या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. राज्य आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले, ‘आताच्या घडीला उद्धव ठाकरेंची अडचण नसून एकनाथ शिंदे यांची आहे. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला आणखी ४१ खासदारांची गरज आहे. त्यात तृणमूल काँग्रेस आणि ठाकरेंचे खासदार धरलेले आहेत. त्यांना आणखी खासदार फोडायचे आहेत’.
‘भाजपला आकडा पाहिजे. सध्या खासदारांना किंमत आहे. परंतु मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर होणार नाही, जर चुकून विधेयक पास झाल्यास सर्व खासदारांची किंमत शून्य होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ‘एकला चलो रे’ नारा दिला होता. महाराष्ट्रात एका बाजुला एकनाथ शिंदे आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा पक्ष आहे. ‘एकला चलो रे’चा नारा असेल, तर २०२९ च्या निवडणुकीआधी दोन्ही पक्षाचे खासदार फुटून भाजपमध्ये जातील. आता भाजपचे शिंदेंवरील प्रेम हे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी आहे. महाराष्ट्रात सत्ता ठेवण्यासाठी आहे. हा सर्व वेळ निघून गेला तर दोन्ही पक्षाचे खासदार फुटून भाजपमध्ये जातील, असा दावा रोहित पवार यांनी केला. रोहित पवारांच्या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.