राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पहायला मिळत आहे. कालच उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका मिळाला असून ६ खासदारांनी बंडखोरी करून शिंदेंच्या गटात प्रवेश केला आहे.त्यामुळे सध्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , आता राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का बसला आहे. रायगड मनसेमधील जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर सुरू झालेले नाराजी नाट्य आता मोठ्या राजकीय घडामोडीत रूपांतरित झाले आहे. मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संदीप ठाकूर यांना डावलून मनसेने रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पक्षात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या. माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही सोशल मीडियावरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. एका बाजूला संदीप ठाकूर यांचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे यामुळे रायगड मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, संदीप ठाकूर यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चांना उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यावेळेस संदीप ठाकूर यांनी ही केवळ कौटुंबिक भेट असल्याचे स्पष्ट केले होते या भेटीचा राजकारणाशी संबंध नसल्याचा दावा केला आहे.
काय म्हणाले संदीप ठाकूर?
संदीप ठाकूर यांना तुमची पुढील राजकीय वाटचाल काय असणार आहे याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ठाकूर यांनी म्हटले की, कुणासोबत काम करावं याबाबत मी महिनाभर विचारमंथन केलेलं आहे. आम्ही लोकांमध्ये राहून लोकांसाठी आणि लोकहितार्थ काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व जर आम्हाला संधी देत असेल तर आम्ही विचार करू. मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलून याबाबत निर्णय घेणार आहे
दरम्यान, एका बाजूला संदीप ठाकूर यांचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे यामुळे रायगड मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रायगड मनसेतील हे नाराजी नाट्य आता कोणते राजकीय वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.