नाशिक जिल्हयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एका शेतकऱ्याने कर्जाची संपूर्ण परतफेड करूनही त्याची जमीन परस्पर लिलावात विकण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या प्रकरणामुळे बँकांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नाना पटोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याने वन टाइम सेटलमेंट (OTS) योजनेअंतर्गत बँकेचे कर्ज पूर्णपणे फेडले होते. मात्र, कर्जाची परतफेड झाल्यानंतरही बँकेकडून संबंधित शेतकऱ्याची सुमारे अडीच कोटी रुपये किमतीची जमीन केवळ 73 लाख रुपयांत लिलावाद्वारे विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पटोले यांनी पुढे दावा केला की, शेतकऱ्यांवर दबाव टाकत आणि दमदाटी करून ही कारवाई करण्यात आली. कर्ज फेडल्यानंतरही जमीन लिलावात काढणे हा गंभीर प्रकार असून, बँकांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळावा, अशी मागणी नाना पटोले यांनी राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे केली आहे. या आरोपांमुळे नाशिक जिल्ह्यातील बँकांच्या कारभारावर आणि शेतकरी कर्जवसुली प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.