महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवार आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे. निवडणुकांच्या संभाव्य तारखांबाबत हालचाली सुरू झाल्या असून, SIR प्रक्रियेचा निवडणूक कार्यक्रमावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
SIRच्या प्रक्रियेमुळे राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदार यादीच्या विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमामुळे ग्रामपंचायत निवडणुका आता नोव्हेंबर अखेर किंवा डिसेंबर अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतिम यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार असून गावगावच्या नवीन कारभाऱ्यांसाठी आता जानेवारी २०२७ ची वाट पाहावी लागू शकते. मात्र विकास कामामध्ये अडथळा येऊ नये यासाठी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, मुदत संपलेल्या आणि निवडणुका प्रलंबित असलेल्या काही ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. एसआयआर अंतर्गत सर्व हरकती आणि सुनवण्या पूर्ण होऊन ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर जानेवारी २०२७ मध्ये निवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीबाबत सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये कार्यकारणी नसल्यामुळे गावपातळीवर विकासकामं आणि महत्वाचे प्रकल्प संथ गतीने सुरू आहेत. निवडणुका पार पडेपर्यंत किंवा पुढील ६ महिन्यांपर्यंत गावाचा कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीची सर्वजण वाट पाहत आहेत. गावातील काम रखडल्यामुळे निवडणुकी लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.