सध्या राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत असून गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरु असून आता उद्धव ठाकरेंच्या गटासह शरद पवारांच्याही गटाला गळती लागली आहे. उद्धव ठाकरे यांचे काही आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चेने ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा अॅक्टीव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेकडून विरोधी पक्षांतील प्रमुख नेत्यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा असतानाच भुसावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेतील दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला आहे.
प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल संतोष चौधरी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. भुसावळ आणि जळगावच्या विकासासाठी मोठी राजकीय ताकद उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने काम करणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे मानले जात आहे. या नव्या राजकीय वाटचालीत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, पाचोरा आमदार किशोर पाटील, आमदार बच्चू कडू, चोपडा आमदार चंद्रकांत सोनवणे, मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील आणि पारोळा आमदार अमोल चिमणआबा पाटील, उपनेत्या सरिता माळी कोल्हे, जळगांव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे अनिल चौधरी आणि भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या नेतृत्वाला नवी राजकीय ताकद मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवारांचे 11 नगरसेवकांनी हाती घेतलं धनुष्यबाण गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्या प्रवेशानंतर नगरपालिकेतील आणखी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये गटनेते सचिन चौधरी, इक्बाल शेख, उल्हास पगारे, सुभद्रा गुंजाळ, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन पाटील, अकील पिंजारी, शबाना खान, पुष्पा चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे. भुसावळच्या राजकारणात या प्रवेशामुळे पुढील काळात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे आता संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.