नेपाळ मध्ये आलेलया महापुराने होत्याच नव्हतं केलं असून हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर कइक बेपत्ता आहेत. याचदरम्यान मात्र आता नेपाळमध्ये देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती येणारी घटना घडली आहे. पुराच्या तब्बल नऊ दिवसानंतर बोगद्यात अडकलेल्या 2 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
नेपाळमधील विनाशकारी पुराच्या नवव्या दिवशी, रसुवा जिल्ह्यातील त्रिशुली-3ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याच्या ढिगाऱ्याखालून काही जणांना जीवंत बाहेर काढण्यात आलं आहे. एक चमत्कारच घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास नऊ दिवसांनंतर दोन जणांना बोगद्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. इतर बेपत्ता कामगारांचा शोध अजूनही सुरू आहे.
अडकलेले कामगार अजूनही जिवंत असण्याची शक्यता
26 ऑगस्ट रोजी आलेल्या विनाशकारी पुरामुळे रसुवासह नेपाळच्या अनेक भागांमध्ये हाहाकार माजला होता. त्यानंतर, त्रिशुली-3 ए जलविद्युत केंद्रात अनेक कामगार अडकल्याचे वृत्त समोर आले. बचावकार्यादरम्यान, बोगद्याच्या आतून आवाज ऐकू आले, ज्यामुळे अडकलेले कामगार अजूनही जिवंत असण्याची आशा निर्माण झाली आहे.
नॅशनल इंडिपेंडंट पार्टीचे खासदार आणि अभियंता श्री राम न्युपाने यांच्या माहितीनुसार, सुटका झालेल्या दोन व्यक्तींची ओळख मेकॅनिकल फोरमन संजय साह आणि मेकॅनिकल सुपरवायझर कबीर महर्जन अशी पटली आहे. 26 ऑगस्ट रोजी पूर आल्यापासून न्युपाने शोध आणि बचाव कार्यात सहभागी आहेत. बचाव पथकाच्या माहितीनुसार, शुक्रवारी संजय साह यांना बोगद्यातून सर्वात आधी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पथकाने कबीर महर्जन यांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
बचाव पथक बोगद्याच्या इतर भागांमध्येही शोध घेत आहे. बोगद्याच्या आतून आवाज ऐकू येत असल्याच्या पूर्वीच्या बातम्या समोर आल्या आहेत. बचाव पथकाने आत असलेल्या लोकांशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला.
बचाव पथकाने बोगद्याच्या आतून आवाज देऊन सांगितले की, घाबरण्याची गरज नाही आणि पथक त्यांना वाचवण्यासाठी येत आहे. यावर, "ठीक आहे," असा प्रतिसाद देणारा आवाज ऐकू आला. नंतर बचाव पथकाने याची पुष्टी केली की बोगद्यात एकापेक्षा जास्त व्यक्ती असण्याची शक्यता आहे. यानंतर, नेपाळी लष्कर आणि सशस्त्र पोलीस दलाने त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य अधिक तीव्र केले.