देशातील हवामानात सध्या मोठे बदल घडत असून आता पावसाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी 26 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याच काळात तब्बल 90 किलोमीटर प्रती तास वेगानं वारं देखील वाहणार आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने सतर्कतेचं आवाहन केलं आहे. तसेच काही भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, अशा इशाराही देण्यात आला आहे.
या राज्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाकडून उद्या 30 ऑगस्ट रोजी तब्बल 26 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारं वाहण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू -काश्मीर, लडाख, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा, नागालँड, सिक्कीम, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा या रांज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पाऊस झाल्यास त्याचा फायदा हा पिकांना होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रात देखील पावसासाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती होत आहे. पुढील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणातील काही भाग, तसेच मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे पिकं संकटात सापडली आहेत. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळू शकते. राज्यात जुलै महिन्याच्या पहिला आठवड्यात आणि तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला होता, मात्र त्यांनंतर पावसाने दडी मारली आहे. परंतु आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.