गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात झालेल्या अचानक वाढीला आता लगाम लागला आहे. त्यामुळे ऐन रक्षाबंधनाच्या मूहूर्तावर नागरिकांचे तोंड गोड करणारी बातमी समोर आली आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली असून, ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले साखरेचे दर आता सुमारे ४८ रुपये किलोवर आले आहेत. साखरेच्या दरात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.
साखरेच्या वाढलेल्या दरावरून लोकांमध्ये संताप व्यक्त होताच , केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली. आता, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे.साखर बाजारात निर्माण झालेली अनैसर्गिक दरवाढ अवघ्या एका आठवड्यात पूर्णपणे ओसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल ६,४०० रुपयांच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचलेले साखरेचे दर तब्बल १,५०० रुपयांनी खाली आले आहेत. गुरुवारी (२७ ऑगस्ट) साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल ४,८०० ते ५,००० रुपये असा रास्त दर मिळाला आहे. त्यामुळे देशात साखरेचा कोणताही तुटवडा नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
येत्या १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामाच्या तोंडावर देशात सुमारे ३० ते ३४ लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. तसेच आगामी हंगामातही गरजेनुसार पुरेसे उत्पादन होणार असल्याने किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रतिकिलो ४५ रुपयांच्या आसपास स्थिर राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.