नाशिक : वाढती वाहतुकीची वर्दळ, ट्राफिक आणि भरधाव वाहनांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान आता अशाच एक भीषण अपघाताची बातमी आता समोर आली आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळ शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा अचानक ताबा सुटल्याने ट्रकने एकापाठोपाठ ६ ते ७ वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ३ जणांचा जागीच मृत्यू, तर ८ ते १० जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरून एक ट्रक जात होता. अचानक ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने समोरून जाणाऱ्या कार, ट्रक तसेच इतर लहान-मोठ्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत तब्बल ६ ते ७ वाहनांचा अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले. काही वाहनांमधील प्रवासी आत अडकल्याने घटनास्थळी मदतकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच चांदवड पोलीस, महामार्ग पोलीस आणि स्थानिक टोल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ट्रक चालकाचे नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, चालकाचा वेग अधिक होता का किंवा ट्रकमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता का, याचा चांदवड पोलीस अधिक तपास करत आहेत.