मराठा आंदोलन तापल ! थेट ''या'' बड्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी
मराठा आंदोलन तापल ! थेट ''या'' बड्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी
img
Nandini khandare More
राज्यात पून्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक जाहले असून आता जरांगे यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. या सात दिवसात अद्याप कोणताच ठोस तोडगा निघालेला नाहीये. त्यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान आता एक  मोठी बातमी समोर आली आहे. 

मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी आंदोलकांनी रास्तारोको, निदर्शने, आंदोलने सुरू केली आहेत. तसेच अनेक जिल्ह्यात बंदही पुकारला आहे. त्यातच आता मराठा समाजाने सर्वात मोठी मागणी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यासाठी आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मनधरणी केली आहे.

सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांचा खोटारडेपणाही चव्हाट्यावर आणला आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह, SCBC आरक्षणाबाबत विखे पाटील यांनी एकही बैठक घेतली नाही. मराठा समाजाशी ते बोलत नाहीत. बैठक घेत नाहीत. समाजासाठी काय करत आहात, ते देखील सांगत नाहीत. त्यामुळे समाजाची दिशाभूल करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा, अशी मागणी करण गायकर यांनी केली आहे.

मुंबईत बैठक घेऊन रणनीती ठरवणार
SCBC आरक्षण टिकवण्यासाठी देखील काही केलं जात नाहीये, असा दावा करतानाच येत्या 8 तारखेला मुंबईत मराठा समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जरांगे पाटील आणि आमचा लढा एकच आहे. जरांगे पाटील मराठवाड्यातील मराठा समाजासाठी लढत आहेत. मात्र इतर ठिकाणी देखील मराठा समाजाचे प्रश्न आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. काल आम्ही सरकार म्हणून जरांगेंची भेट घेतली. त्यांच्या अभ्यासाकांसोबत देखील तीन तास आम्ही चर्चा केली. मनोज जरांगे यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. त्यांच्या तब्येतीची परिस्थिती बघता ते उपोषण सोडतील अशी आम्हाला अपेक्षा होती. आम्ही त्यांना उपोषण सोडण्याचे नाही तर स्थगित करण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी स्पष्टपणे त्याला नकार दिला, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

कोंडी सोडण्याचा प्रयत्न
दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीत त्यांनी पाणी घेतले. औषधोपचार घेण्याची मागणी देखील त्यांनी आमची मान्य केली. यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी आता तरी आम्हाला नाही. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे संपूर्ण मराठवाड्यात जी अस्थिरता आहे, ती कुठेतरी संपावी, आमच्या शब्दाचा त्यांनी मान ठेवावा ही विनंती मी मनोज जरांगे यांना करतो. आज सकाळी मी त्यांना निरोप पाठवला, त्यांनी सांगितले आहे की, एक-दोन दिवसात मी पुन्हा अभ्यासकांशी चर्चा करेल. तुम्ही जे जे निर्णय घेतले ते कागदावर मला पाठवा. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही ते निर्णय त्यांना पाठवण्याचा प्रयत्न करू. ही कोंडी कशी सुटेल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असंही लाड म्हणाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group