राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. याचदरम्यान आत अनेक मोठी अपडेट समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ जिल्ह्यांत कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील मागील ५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. मागील दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने संतापाची लाट पसरली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या, गुरुवारी (३ सप्टेंबर) मराठा समाजाच्या वतीने जालना, बीड, परभणी आणि लातूर या ४ जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तोडगा न निघाल्यास धाराशिव जिल्हाही बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरकारने आजच ठोस तोडगा काढला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आणखी तीव्र आणि आक्रमक आंदोलन उभारण्याचा इशारा मराठा समाजाने दिला आहे. आज अनेक ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला आहे. संभाजीनगर, परभणी, जालना, धाराशिव, बीड, लातूरसह अनेक ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरला. सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
काय बंद राहील: चारही जिल्ह्यांतील सर्व बाजार समित्यांमधील व्यवहार पूर्णपणे ठप्प राहतील. व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिल्यास सर्व किरकोळ व ठोक दुकाने बंद राहतील. प्रमुख महामार्ग आणि शहरांमधील वाहतूक मराठा कार्यकर्त्यांकडून रोखली जाण्याची शक्यता आहे.
सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने नियमित सुरू राहतील. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक संस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध पुरवठा, रुग्णवाहिका आणि इतर आणीबाणीच्या सेवा बंदमधून वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.