नेपाळच्या उत्तर भागात भोटेकोशी नदीला अचानक आलेल्या महापुराने रसुवा जिल्ह्यात मोठे संकट निर्माण केले आहे. बुधवारी सकाळी नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने नदीकाठच्या परिसरात पाणी शिरले आणि अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या महापुराने मोठा हाहाकार माजला असून स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या भागांना पुराचा फटका बसला आहे. पुराच्या तडाख्यामुळे घरे आणि स्थानिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून प्रभावित भागांत शोध, बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे..
प्रशासनाने अद्याप मृत्यू, जखमी आणि मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. स्थानिक अधिकारी, रहिवासी आणि सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेली प्राथमिक माहिती, तसेच फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दर्शवतात. आतापर्यंत १३ मृतदेह सापडले असून, बचाव आणि मदत कार्य सुरू झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत १,००० हून अधिक लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
काठमांडू पोस्टने रसुवाचे मुख्य जिल्हाधिकारी नरेंद्र परियार यांच्या म्हणण्यानुसार, पुराचे कारण सध्या अस्पष्ट आहे. जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या परिसरात पाऊस झालेला नाही आणि हवामानही स्वच्छ आहे. वरच्या भागातील धरण फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असावा, असा संशय आहे. प्रशासनाने सांगितले की, लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक अहवालानुसार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.
स्थानिक रहिवासी अजय श्रेष्ठ म्हणाले की, “पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की जणू एखादे धरण अचानक फुटले आहे असे वाटत होते. या पुरामुळे चिलिमे जलविद्युत प्रकल्पासह अनेक जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. ” नदीचा प्रवाह पाहता, नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांतील खालच्या भागातील क्षेत्रांनाही पुराचा धोका आहे.
पूर आणि भूस्खलनामुळे तिमुरे येथे अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी पाठवलेले ‘अल्टिट्यूड एअर’चे हेलिकॉप्टर न उतरताच काठमांडूला परतले. पायलटने सांगितले की, “तिमुरे येथील स्थानिक हेलिपॅड पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पूर्णपणे वाहून गेले होते, त्यामुळे उतरण्यासाठी कोणतीही सुरक्षित जागा शिल्लक नव्हती. पूर आणि ढिगाऱ्यांमुळे संपूर्ण तिमुरे गाव आकाशातून जवळजवळ अदृश्य झाले होते.”