गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत रिक्षा टॅक्सी अमराठी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केल्यापासून मोठा वाद सुरु असून आता या निर्णयावरून नवा वाद पेटला आहे.
मुंबईत ऑटो, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषा अनिवार्य केली आहे. या निर्णयावरून नवा वाद पेटला आहे. मुंबईतील काही चालकाने मराठी बोलण्यास नकार दिलाय. रकारच्या या निर्णायाविरोधात चालकांमध्ये नाराजी आहे. त्या विरोधात मुंबईतील ऑटो-रिक्षा चालकांच्या एका गटाने सोमवारी आंदोलन करत तीन दिवसांचा संप सुरू केला आहे. रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या चालकांमुळे सर्वसामान्यांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याच्या विरोधात चालकांनी कांदिवली लिंक रोडवर रस्ता अडवला. आंदोलकांच्या मते, अनेक ज्येष्ठ चालकांचे औपचारिक शिक्षण खूप कमी आहे. अथवा अजिबात झालेले नाही. भाषेची अट पूर्ण करण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. 'आमचं वय ५५-६० वर्षांचं आहे. आम्ही कधी शाळेत गेलो नाही. आम्ही मराठी कशी बोलणार? जर आम्ही शिकलो असतो, तर आज ऑफिसमध्ये बसलो असतो, असे एका चालकाने सांगितले.
एका रिक्षा चालकाने सांगितले की, अनेक आंदोलक तुटक मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी वेळ देण्याऐवजी दंड आकारला जात होता. आम्ही दंड म्हणून १५,०००-२०,००० रुपये भरू शकतो का? जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हा तीन दिवसांचा संप ठेवणार आहे.