राज्याच्या हवामानात सध्या अनेक बदल होत असून गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची उघडीप सुरु असून हवामान विभागाने पुढील ५ दिवसांसाठी पावसाचा नवा अंदाज जाहीर केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची मोठी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे. मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरणात हा बदल झाला आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. स्थानिक पातळीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विजा चमकत असताना झाडांखाली किंवा खुल्या मैदानात थांबणे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील किनारपट्टीच्या भागात काही ठिकाणी रिमझिम ते मध्यम पावसाची हजेरी राहील. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक हवामान बदलांमुळे दुपारनंतर किंवा संध्याकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. राज्यात कमाल आणि किमान तापमानात फार मोठा बदल होणार नसून बहुतांश भागांत ऊन-सावल्यांचा खेळ आणि उकाडा कायम राहील.