देशातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी. वाय. पाटील यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले आहे.ते ९० वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.
काँग्रेसमध्ये नेते असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. डी. वाय. पाटील यांनी संस्था उभारणीतून नागरीक घडतात, समाजाची उभारणी होते, या धोरणातून राज्यात शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८३ मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (RAIT) या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. आज त्यांच्या 'डी. वाय. पाटील ग्रुप' अंतर्गत ७ पेखा जास्त अभिमत/खाजगी विद्यापीठे आणि १५० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.