संतापजनक ! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने तरुणाचा गेला जीव ;  पहा VIDEO
संतापजनक ! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने तरुणाचा गेला जीव ; पहा VIDEO
img
Nandini khandare More

रुग्णवाहिकेचा वापर रुग्णाला उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याचा उपचार व्हावा जीवाला कोणताही धोका होऊ नये म्हणून केला जातो. परंतु याच रुग्णवाहिकेत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. 

मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या एका 21 वर्षीय तरुणाला व्यवस्थेच्या बेजाबदारपणामुळे जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सरकारी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

या घटनेमुळे आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा आणि विलंब अधोरेखित झाला आहे. सुनहारा माल गावातील रहिवासी असलेल्या अजित बारिया याला 27 जुलै रोजी बाम्हणी रुग्णालयातून मंडला येथे ऑक्सिजनच्या आधारे हलवले जात असताना मृत्यू झाला. प्रशासनाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मंडलाचे जिल्हाधिकारी राहुल नामदेव धोटे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. "या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल," असं धोटे यांनी सांगितल आहे.


अजितचे वडील अमन बारिया यांनी आरोप केला आहे की, तीन तासांच्या प्रवासादरम्यान ऑक्सिजन सिलिंडरमधील वायू संपल्यामुळे त्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि त्याचा मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन गेज 'शून्य' पातळी दर्शवत असल्याचे दाखवणारा एक व्हिडिओही कुटुंबीयांनी रेकॉर्ड केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत अजितला श्वास घेताना त्रास होत असून आई-वडिलांच्या मांडीवर जीव शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे.



अमन बारिया यांनी पत्रकारांना सांगितले की, 27 जुलै रोजी मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर त्यांनी राज्य सरकारच्या 'डायल 108' सेवेद्वारे रुग्णवाहिका बोलावली होती. "त्याआधी, मी मंडला येथील डायलिसिस केंद्राशी संपर्क साधून लवकर अपॉइंटमेंट मिळण्याची विनंती केली होती. त्यांनी ती विनंती नाकारल्यानंतर, मी 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन केला. त्यांना मुलाच्या श्वासोच्छवासाच्या समस्येबद्दल माहिती दिली आणि विशेषतः सोबत ऑक्सिजन आणण्यास सांगितले. रुग्णवाहिका एका तासानंतर आली, परंतु डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय ऑक्सिजन देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला," असे त्यांनी सांगितले. तसेच, रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हा रुग्णालयात जाण्याची त्यांची विनंतीही फेटाळून लावली आणि त्यांना सर्वात जवळ असलेल्या बाम्हणी येथील सरकारी रुग्णालयात नेले, असेही त्यांनी नमूद केले.

"बम्हनी येथे माझ्या मुलाची अवस्था पाहून डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांना फटकारलं, त्यांना ऑक्सिजन देण्यास सांगितलं आणि आम्हाला जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण साधारण तीन किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर त्यातील ऑक्सिजन संपलं," असे ते म्हणाले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group