कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रस्त्यांचे काम सुरु आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदले असून जेणेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. दरम्यान सध्या राज्यासह नाशकात पावसाने जोर धरलेला असताना या रस्त्यांची अधीकच दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अतिरीक्त त्रास सहन करावा लागत असून गेल्या पाच महिन्यांत खड्ड्यांमुळे ५ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली भीषण दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा नाहक बळी गेल्यानंतर शहरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. अंबड एमआयडीसीतील एक्सलो पॉईंट परिसरात खड्डे आणि चिखल वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या धडकेत 40 वर्षीय निलेश कोतकर (यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या पाच महिन्यांत खड्ड्यांमुळे झालेला हा पाचवा बळी ठरल्याने राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ नाशिक गाठत मृत निलेश कोतकर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यादेखील उपस्थित होत्या. मंत्री महाजन घरी पोहोचताच निलेश यांच्या पत्नीला आणि कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. या अत्यंत भावूक वातावरणात मयत निलेश यांच्या वडिलांनी कौटुंबिक परिस्थितीची जाणीव करून देत, "आमची नात आणि सुनबाईच्या भविष्यासाठी प्रशासनाने काहीतरी केले पाहिजे, तसेच निलेश यांच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्यात यावी," अशी अत्यंत आर्त मागणी मंत्री महाजन यांच्याकडे केली.
कोतकर कुटुंबाचे दुःखाश्रू पुसत मंत्री गिरीश महाजन यांनी संवेदनशीलतेने त्यांची बाजू ऐकून घेतली. कुटुंबाला आधार देत "मी या सर्वांची पूर्ण जबाबदारी घेतो," असे स्पष्ट आणि ठोस आश्वासन महाजन यांनी या वेळी दिले. मंत्री महाजन यांच्या भेटीनंतर कोतकर कुटुंबीयांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, "परमेश्वराने आम्हाला न्याय दिला नाही, परंतु आता शासन नक्कीच न्याय देईल यावर आमचा विश्वास आहे. ज्या वेदनेतून आम्ही जात आहोत, तशी वेळ आमच्यासारखी दुसऱ्या कोणावरही येऊ नये, हीच आमची अपेक्षा आहे," असे त्यांनी म्हटले.