पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक केला असून आता देशासह राज्यात मोठं धुमाकूळ घातला आहे. रुजतील अनेक जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून आता हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा (२३ जुलै ते २७ जुलै २०२६) जिल्हास्तरीय अंदाज आणि इशारा जारी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , २७ तारखेपर्यंत कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट दिलेला नाही. राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून रेड अलर्ट पूर्णपणे हटवण्यात आला आहे. मात्र, धोका अद्याप टळलेला नसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शुक्रवारी राज्यातील पुणे घाट आणि सातारा घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. तर पालघर, नाशिक घाट, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर घाट या भागात पावसाचा जोर काहीसा कमी होऊन 'यलो अलर्ट' राहील. याशिवाय विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. २४ जुलै रोजी कुठल्याही जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.
शनिवारी २५ जुलै रोजी पावसाचा जोर आणखी कमी होणार असून या दिवशी राज्यात ऑरेंज आणि रेड अलर्ट पूर्णपणे निरंक राहतील. २५ जुलैला केवळ रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट आणि सातारा घाट या भागांत हवामान विभागाने 'यलो अलर्ट' कायम ठेवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावसाची तीव्र तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल.