काल रात्री पासून नाशिक जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आता गंगापूर धरणाचा साठा वाढला आहे. गुरुवार सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला होता. दरम्यान आता गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, हा विसर्ग आता 1 वाजता 12,600 करण्यात आला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 1 वाजता 12,600 क्यूसेक्सने विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच, परिसरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य, जनावरे आणि इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.