विवाहितेचा होणारा छळ आणि त्यातून होणाऱ्या महिलांच्या आत्महत्या याचे प्रमाण वाढले असून अनेक स्त्रिया कौटुंबिक छालाल्बाली पडतात आणि त्यातून आत्मह्त्येसारखे मोठे पाऊल उचलतात. आता अशीच एक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे.
उत्तराखंडमधील देहरादूनच्या डोईवाला परिसरात राहणाऱ्या सरकारी शिक्षिका सृष्टी कंडारीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. सृष्टीचा विवाह 29 नोव्हेंबर 2025 रोजी हर्रावाला येथील सचिवालय कर्मचारी सौरभ रतूडी याच्याशी त्रियुगीनारायण मंदिरात झाला होता. मात्र लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये तिने सृष्टी टोकाचा निर्णय घेतला आहे. 29 जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सृष्टीने एक भावनिक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यामध्ये तिने सॉरी मम्मी… मी अशी निघून जातेय असे म्हणत आपल्यावर होत असलेल्या छळाची व्यथा मांडली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मृत सृष्टीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, लग्नानंतर सातत्याने तिचा हुंड्यासाठी, मानसिक छळ करण्यात आला. तसेच अंधश्रद्धेमुळे तिला अपशकुनी ठरवत वारंवार त्रास दिला जात होता. तक्रारीनंतर डोईवाला पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 80(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण उत्तराखंडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
सृष्टीची आई सीमा कंडारी यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर सुमारे तीन महिन्यांनी सृष्टीच्या सासऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर त्यांना कर्करोगाचे निदान झाले. एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून सासरच्यांनी सून घरात आल्यानंतरच सर्व अनिष्ट घडू लागल्याचा समज करून घेतला. तीन दिवस आधी सासऱ्यांचे निधन झाल्यानंतर सृष्टीवरील मानसिक दबाव आणखी वाढवण्यात आला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सृष्टीने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, सॉरी मम्मी मी जातेय, हे लोकांचे विचार सुधारणारे नाहीत. मला त्रास देण्यात आला, मी आता जास्त सहन करू शकत नाही. सृष्टी मूळची देवप्रयाग येथील रिगौली गावातील रहिवासी होती आणि गणित विषयात ती अव्वल विद्यार्थिनी होती. 29 जुलै रोजी तिच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय श्रीनगरहून देहरादूनला पोहोचले. तेव्हा त्यांना सृष्टीच्या मृत्यूची माहिती मिळाली. कुटुंबीयांचा दावा आहे की, सृष्टी आत्महत्या करणारी नव्हती आणि अंधश्रद्धेमुळे तिचा मानसिक छळ करण्यात आला.
देवप्रयागचे आमदार विनोद कंडारी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची भेट घेऊन निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गृहसचिवांना लेखी आदेश देत या प्रकरणाचा तपास CB-CID कडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पोलिस पोस्टमॉर्टेम अहवाल आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करत आहेत.