सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. कोकणात भाजपला मोठा धक्का बसला. कुडाळमधील भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांनी भाजपची साथ सोडताना अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपामुळे सिंधुदुर्गमध्ये राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपला रामराम ठोकल्यानंतर ते कोणत्या पक्षासोबत जाणार आहे याबाबत अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ नगरपंचायतमधील सत्ताधारी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका संध्या प्रसाद तेरसे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. आपल्या नगरसेवकपदाचा त्यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपला जोरदार धक्का बसला आहे. त्यांनी राजीनामा देताना त्यामागचे कारण देखील सांगितले आहे.
पक्ष कार्यालय अजित पवार गटाचच Hasan Mushrif यांचे विधान कुडाळ नगरपंचायतीच्या ताब्यातील हिंदु कॉलनी येथील १४१ गुंठे जमीन नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नगरपंचायतीच्या ताब्यातून गेल्याचा गंभीर आरोप संध्या तेरसे यांनी करीत या प्रकरणी १० जुलैला नगरपंचायतीसमोर उपोषणही केले होते. ही जागा परत नगरपंचायतीच्या ताब्यात मिळण्यासाठी त्यांनी आक्रमकपणे लढा उभारला होता. त्यांच्या या लढ्याला कुडाळमधील सर्वच राजकीय पक्षांनी पाठींबा दिला होता.
नगरपंचायतीच्या विशेष सभेतही त्यांनी या प्रकरणी आक्रमकपणे आवाज उठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली होती. मात्र या जमीन गैरव्यवहारात प्रशासनाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्यामुळे त्यांनी हताश होऊन आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. दरम्यान त्यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे कुडाळमधील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.