जून महिना पूर्ण प्रतीक्षा करायला लावणाऱ्या मान्सून ने अखेर हजेरी लावलेली असून जुलै महिन्याचा पहिल्याच तारखेपासून पावसाने दणादन बरसायला सुरुवात केली आहे. दरम्यान आता हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
पुणे वेधशाळेने 5 ते 7 जुलैदरम्यान राज्यभर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस असणार आहे. कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्रकिनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
मुंबईच पश्चिम उपनगरांमध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रे या सर्व भागांमध्ये जोरदार सरी कोसळतायत. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा दुपारच्या सुमारास चांगलाच जोर वाढला आहे. मुंबईत उद्या (गुरुवार) आणि परवा (शुक्रवारी) देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यातील इतर सर्व जिल्ह्यात पुढील आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पालघर जिल्ह्याला 2 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी या संबंधित आदेश जारी केले आहेत, अस असलं तरी मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मात्र कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करावं लागणार आहे. हवामान खात्याच्या रेड अलर्ट इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 2 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.