महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचं दुहेरी संकट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणसह मराठवाड्यातील काही भागात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भासह मराठवाड्यातील काही भागात उष्णतेचा कहर सुरू आहे. आज पुन्हा विदर्भात होरपळून काढणारी उष्णता राहणार असून कुठं ऑरेंज तर कुठं रेड अलर्ट असेल.
वर्धा, अकोला आणि अमरावतीमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. काल जवळपास जिल्ह्यांमध्ये 43 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. गडचिरोली, गोदिंया, नागपूर, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. बीड, धाराशिव आणि लातूर या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. विदर्भात पुढील काही दिवस उष्णता वाढण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळावे. उष्णघाताच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे.
महाराष्ट्रात हवामानाचे विविध पैलू पाहायला मिळणार आहेत. विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून, मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात कमालीचा उकाडा जाणवेल. मुंबई तसेच ठाणे, पालघर आणि रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आज 25 मे रोजी हवामान प्रामुख्याने दमट आणि अंशतः ढगाळ राहील.
मुंबईत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असला, तरी हवेतील अतिउच्च आर्द्रतेमुळे प्रत्यक्षात उष्णतेचा त्रास जास्त जाणवेल. किनारपट्टीच्या काही भागांत संध्याकाळच्या वेळी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु यामुळे उकाड्यापासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रता वाढणार असून, यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
किनारपट्टीच्या काही भागांत संध्याकाळच्या वेळी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु यामुळे उकाड्यापासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. काही जिल्ह्यांमध्ये काल पावसाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस तापमान असल्याने मोठा फटका बसत आहे.