राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी पावसानं हाहाकार माजवला असून अनेक राज्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाने बुधवारी देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशावर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दोन दिवसात अनेक भागात पावसाची हजेरी पहायला मिळणार आहे. तसेच या आठवड्यातील बहुतांश दिवस पश्चिम हिमालयीन भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, बुधवारच्या आसपास उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे 11 ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान ओडिशातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतही मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात कसे असेल हवामान?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या काही भागांत 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहू शकतो. याशिवाय रायगड, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण आणि गोवा परिसरात या आठवड्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पर्वतीय आणि आसपासच्या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये 11 ते 17 ऑगस्टदरम्यान अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडमध्ये 11-12 ऑगस्ट तसेच 14-15 ऑगस्ट रोजी चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय पश्चिम मध्य प्रदेशात 11 ते 15 ऑगस्टदरम्यान, तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात 11 ते 17 ऑगस्टदरम्यान मोठ्या परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने सांगितले की, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे झाडांच्या फांद्या तुटणे, सखल भागांत पाणी साचणे, चिखलाचा प्रवाह आणि अचानक पूर यांसारख्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. पर्वतीय भागांमध्ये, विशेषतः हिमाचल प्रदेशातील चंबा, कांगडा, शिमला तसेच उत्तराखंडमधील उत्तरकाशी आणि चमोली जिल्ह्यांत अचानक पूर येण्याचा धोका काय असल्याचे समोर आले आहे.