मान्सून अपडेट ; पावसाचे आगमन केव्हा ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज
मान्सून अपडेट ; पावसाचे आगमन केव्हा ? काय आहे हवामान विभागाचा अंदाज
img
Nandini khandare More




गेल्या काही दिवसांनपासून राज्यासह देशातील वातावरणात कमालीचे बदल होताना दिसत आहेत. काही राज्यांमध्ये कडाक्याचा उन्हाळा आहे तर काही राज्यांमध्ये मात्र पावसाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता अनेक राज्यात उकाडा निर्माण झाला असून हवामान विभागाने काहीशी दिलासादायक माहिती दिली आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने  दिलेल्या ताज्या माहितीनुसार, यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होण्याचे संकेत मिळत आहेत. १६ मे २०२६ पर्यंत नैऋत्य मोसमी वारे अंदमान आणि निकोबार बेटांवर धडकण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याने पावसाच्या आगमनाचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे बळीराजासह संपूर्ण देशाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.

मान्सून अंदमानात दाखल होण्यापूर्वीच दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाच्या हालचाली वाढणार आहेत. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांत पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने या राज्यांमध्ये 'येलो अलर्ट' जारी केला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात वाऱ्याचा वेग आणि दिशा मान्सूनला पुढे सरकवण्यासाठी पूरक आहे. १६ मे च्या सुमारास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान बेटांच्या काही भागांत मान्सून दाखल होईल. दरवर्षी साधारणपणे २० मे च्या सुमारास मान्सून अंदमानात येतो, मात्र यंदा तो काही दिवस आधीच पोहोचण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात मान्सून केव्हा ? 

दरम्यान , अंदमानात मान्सून वेळेवर पोहोचला तरी महाराष्ट्रात त्याच्या आगमनासाठी जून महिन्याची प्रतीक्षा करावी लागेल. साधारणपणे १ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि त्यानंतर १० जूनच्या सुमारास तो तळकोकणात पोहोचतो. मात्र, अंदमानातील प्रगती वेगवान राहिल्यास महाराष्ट्रातही पावसाचे आगमन लवकर होऊ शकते. सध्या महाराष्ट्रात प्रचंड उकाडा जाणवत असून मान्सूनपूर्व सरींची प्रतीक्षा कायम आहे.

हवामान विभाग मान्सूनच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवून आहे. एकदा का मान्सून अंदमानात स्थिरावला की, तो केरळच्या दिशेने कधी सरकणार याची अधिकृत तारीख जाहीर केली जाईल. यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आल्यामुळे कृषी क्षेत्रासाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. पुढील काही दिवसांत मान्सूनच्या प्रगतीबाबत हवामान विभाग अधिक स्पष्टता देणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group