गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात मोठ्या घडामोडी घडत असून जागतिक तणावामुळे सध्या देशात त्याचा झळा निर्माण झाल्या आहेत. याच दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
हार्मूज सामुद्रधुनीबाबत निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. हार्मूज सामुद्रधुनी काही काळ बंद राहिली तरी भारतात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, भारताकडे सध्या 30 ते 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील कोणत्याही तात्पुरत्या अडचणींचा देशाच्या इंधन पुरवठ्यावर तात्काळ परिणाम होणार नाही.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी पुरवठा मार्ग विकसित केले आहेत. तसेच विविध देशांकडून कच्च्या तेलाची आयात करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या विशिष्ट मार्गात अडथळा निर्माण झाला तरी इंधन पुरवठा सुरळीत ठेवणे शक्य होणार आहे.
नागरिकांनी इंधन उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. भारत कोणत्याही संभाव्य संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम असून, देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हार्मूज सामुद्रधुनीच्या भवितव्याकडे जगाचे लक्ष लागले असताना, भारत सरकारने इंधन पुरवठ्याबाबत दिलासा देणारी भूमिका मांडल्यामुळे नागरिकांमधील चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.