नीट पेपर फुटी प्रकरणावरून सध्या देशात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना देशभरातून पाठिंबा मिळत आहे.
सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आमने-समाने आले, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्यानंतर आता देशात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला असून, अण्णा स्वत: आता मैदानात उतरले आहेत, त्यांनी मोठी घोषणा केली आहे.
विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे उद्या मौन आंदोलन करणार आहेत. साकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारकामध्ये अण्णा हजारे हे आंदोलन करणार आहेत. सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून, त्याचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी देखील यावेळी अण्णा हजारे यांनी केली आहे. दरम्यान अण्णा जिथे आंदोलन करणार आहेत, त्या जागेला प्रतिकात्मक “नगरचे जंतर मंतर” असं नाव देखील देण्यात येणार आहे. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.