राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळत आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलास मिळाला आहे. येत्या 24 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार असून, मराठवाड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भात पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यात साधारण तर काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गोंदिया भंडारा , गडचिरोली जिल्ह्याला पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 24 जुलैनंतर पावसात पुन्हा खंड पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भाच्या तुलनेत पश्चिम विदर्भात कमी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईमध्येही पाऊस
दरम्यान पुन्हा एकदा मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. मुंबईमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसासोबतच वारं देखील असल्यामुळे नोकरदार वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जोरदार पाऊस सुरू आहे.