सध्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर देखील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून ऑपरेशन टायगर सुरूच राहणार आहे, अशा पद्धतीचा दावा करण्यात येते आहे. या सर्व पार्श्वभूमीर आता मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे दहा ते बारा नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी या सर्व नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती.
या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीनंतर या नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. मातोश्रीवर खासदारांची बैठक झाली, त्यानंतर काही खासदार फुटले. परंतु आमचे नाशिकचे खासदार फुटले नाहीत. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगतो आज मातोश्रीवर नगरसेवकांची बैठक झाली. परंतु आमचा एकही नगरसेवक फुटणार नाही. चार पाच दिवसापूर्वी मीडियाने एक बातमी दाखवली होती, ती बातमी पेड होती. शिवसेना ठाकरे गटाचे दहा ते पंधरा नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अशी ती बातमी होती, या बातमीमुळे प्रचंड गोंधळ उडाला. परंतु असंही काहीही होणार नाहीये. त्यामुळेच आज आम्ही उद्धव ठाकरेंकडे वेळ मागितली होती. त्यांनी आज आम्हाला बारा वाजता भेटायला बोलावलं होतं. आज आम्ही त्यांना भेटलो. आज आम्ही त्यांना वचन दिलं, की नाशिकचे 15 ही नगरसेवक शिवसेना ठाकरे गटातच राहातील, एकही नगरसेवक बंडखोरी करणार नाहीत, असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.
दरम्यान आजच्या बैठकीला सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते, एकही नगरसेवक गैरहजर नव्हता. शिवसेना शिंदे गटाच्या लोकांकडून या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांनी आमच्या पाच ते सहा नगरसेवकांशी संपर्क साधला. प्रत्येकाला प्रभाग निधी म्हणून 5 कोटी रुपयांचा निधी देतो, असं सांगितलं होतं. त्यानंतर काही त्यांनी वेगळं आमिष दिलं असेल तर ते माहिती नाही, परंतु आमचे सर्व नगरसेवक हे कायम उद्धव ठाकरेंसोबतच राहणार आहेत, अशी भूमिका यावेळी या नगरसेवकांनी स्पष्ट केली आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून पाच ते सहा नगरसेवकांना 5 कोटी रुपयांच्या निधीची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आला आहे, परंतु एकही नगरसेवकाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला नाही, सर्व नगरसेवक हे आजच्या बैठकीला उपस्थित होते, त्यामुळे यावेळी आता ऑपरेशन टायगर फसलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.