बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेहमीच काहीना काही अपडेट येतच असतात. या योजनेचा लाभ गरजू महिलांना विनाअडथळा घेता यावा म्हणून सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या हजारो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करूनही बऱ्याच महिलांचा महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता बंद झाला होता. आता अशा सर्व पात्र महिलांच्या अर्जांचे पुन्हा एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
ई-केवायसीतल्या त्रुटी किंवा कागदपत्रांच्या पडताळणीतल्या अडचणींमुळे अनेक महिलांचे हप्ते थांबले होते. आदिती तटकरे यांनी सांगितलं की, ई-केवायसीसाठी सरकारने अनेकदा मुदतवाढ दिली होती. सुरुवातीला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आणि नंतर ती ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतरही ज्या महिलांच्या ई-केवायसीमध्ये काही चुका राहिल्या होत्या, त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठी एप्रिल २०२६ पर्यंत संधी देण्यात आली. सरकारच्या माहितीनुसार, ई-केवायसी न केल्यामुळे ६० लाखांपेक्षा जास्त महिला योजनेबाहेर राहिल्या आहेत.
तसेच उप्तन्न मर्यादा ओलांडल्यामुळे १३ ते १४ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केलं की, ज्या महिलांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण केली असुनही लाभ मिळालेला नाही, त्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी केली जात आहे. कोणत्याही पात्र महिलेला अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिली. तसेच संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या दोन्ही योजनांसाठी अर्ज करुनही कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे त्या महिलांना किमान एका योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.